गायत्री मंत्राचे निरूपण करताना पं. जेद म्हणाले की, आम्ही त्या परम सत्तेची उपासना करीत आहोत, की जी पृथ्वी, अंतीरिक्ष आणि देवलोकात व्याप्त आहे. तो आमच्या बुध्दीत प्रकाश पाडो! ‘असतो मा सद्-गमय तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय’ श्लोक उच्चारण करीत त्यांनी प्रार्थना केली की हे भगवान्, आम्हास असत्याकडून सत्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मृत्यूतून अमरत्वाकडे घेऊन चल.
तैतिरीय उपनिषदाचा प्रारंभिक शांतीपाठ-‘ॐ सहलाववतुा सहनी भुनक्तुा सहवीर्यं करवावहैा तेजस्वि नामाधितमस्तुा मा विद्विषा वहैा’ म्हणून इंग्रजीत अर्थ सांगितले. . .’हे पूर्ण ब्रह्म परमात्मन्, आम्हा दोघांचं एकसाथ रक्षण होऊ दे. आम्हा दोघांचं पालन होऊ दे. आम्हाला एकत्रिपणे वीर्य (तेज व शक्ती) अर्जित करू दे. आमचे ज्ञानार्जन तेजस्वी होवो. आम्ही परस्पर द्वेष न करो.’ मंत्रोच्चाराची समाप्ती ‘ॐ शांती: शाती: शाती:’ ने झाली. ‘पूर्ण विश्वाच्या सर्वप्रकारच्या शांतीची आम्ही कामना करतो’, या शांतिकामनेने सिनेटला दुस–या दिवशी इराक युद्धावर चर्चा करण्यासाठी उपयुक्त मन:स्थिती निर्माण केली.
या प्रार्थनेत कोठेही संकुचित पन्थाभिनिवेश नव्हता. कोणाच्या प्रती राग-द्वेष नव्हता. या प्रार्थना संपूर्ण ब्रह्मांड, समस्त मानवजातीची शांती आणि कल्याणची कामना करणा-या होत्या.
परंतु पं. जेद मंत्रोच्चार करण्यासाठी उभे राहाताच गॅलरीत बसलेले तिघे (दोन महिला आणि एक पुरूष) जोरजोरात ओरडू लागले. ‘जीझस ख्राईस्ट’ च्या समोर खोट्या आणि दुष्ट देवतांची स्तुती होत आहे. हे निंदनीय आहे. हे प्रभू येशू आम्हाला क्षमा कर! कारण आम्ही तुझ्यासमोर दुष्टांची प्रार्थना होताना पाहात आहोत. तिसरा विरोधक बरळत होता की ‘हे पाप आहे, घृणास्पद आहे. आम्ही तुमच्या कोणत्याही देवतांना येथे थारा देणार नाही.’ सदनातील एकाही सदस्याने विरोधकांची बाजू घेतली नाही, यातच अमेरिकी सदनाची महानता आहे. अध्यक्ष स्थानी असलेले डेमोक्रॅटिक सदस्य बाब जेसी यांनी तात्काळ पोलिसांकरवी या तिघांना बाहेर काढण्याचा आदेश दिला. त्या तिघांना फरफटतच बाहेर काढण्यात आले. ‘जीझस ख्राईस्ट’ यांच्या शिवाय आम्हाला दुसरा देव मान्य नाही,’ असे ते यावेळी ओरडत होते. सदनाची अवमानना केली म्हणून हातात बेड्या टाकून त्या तिघांची कारागृहात रवानगी करण्यात आली.
या घटनेमुळे 34 वर्षापूर्वीची एक घटना मला आठवते. 1972 मध्ये हरे कृष्ण आंदोलनाचे प्रणेते प्रभुपाद भक्तिवेदांत यांचे दिल्लीत आगमन झाले होते. ‘पाञ्यजन्य’चा संपादक या नात्याने मी त्यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे भगवे किंवा श्वेत वस्त्र परिधान केलेले, लांब शिखा ठेवलेले, गळ्यात माळा घातलेले अनेक शिष्य भेटले. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. नया बाजार येथील पाञ्यजन्य कार्यालयाला भेट देण्याचे निमंत्रण मी त्यांना दिले. दोन शिष्य आले. ते माझ्या खोलीतील भगवान शिवाची प्रतिमा पाहून अवघडले व मला विचारू लागले-‘व्हाय शिवा? व्हाय नॉट कृष्णा?’ (येथे शिवाची प्रतिमा का? कृष्णाची का नाही?)
वस्तुत: अमेरिकी मन समृद्धी, भोग आणि स्वराचाराच्या शिखरावर जाऊन आता विरक्त होत आहे. आपल्या आध्यात्मिक सुखाचे अनुभव घेत आहे, परंतु ख्रिस्ती चर्चचे निर्जीव कर्मकांड, ख्रिस्ती विलासी जीवनशैली आणि अनैतिक लैगिक शोषणाच्या असंतोष आणि अनास्था निर्माण झाली आहे. चर्चच्या प्रेमाच्या भाषेमागे घोर असहिष्णुता आणि संकुचितता असल्याचे स्पट झाले आहे. अमेरिकेतील अनेक मोठ्या न्यायालयांमध्ये चर्चच्या अनेक मोठ्या पाद्रयांविरूध्द अल्पवयीन आणि भाविक महिलांचे घृणित लैगिंक शोषण केल्याने खटले सुरू आहेत. अमेरिकी मीडियाला या बातम्यांचा उबग आला आहे.
हिंदुस्थान टाईम्समध्ये दि. 16 जुलै रोजी प्रकाशित वृतानुसार कॅथॉलिक चर्च बदनामी आणि खटल्याने त्रस्त झाली आहे. 1940 पासून आतापर्यंतच्या पाद्र्यांच्या लैंगिक शोषणाचे बळी ठरलेल्या 500 अमेरिकनांना नुकसानभरवाई म्हणून सार्वजनिक क्षमायाचनेसह 66 कोटी डॉलर (जवळ जवळ 3 हजार कोटी रूपये) द्यायला तयार आहे. सांप्रदायिक संकुचितता आणि द्वेषभाव चर्चमध्ये व्यापून राहिले आहेत. आर्थोंडॉक्स चर्चविषयी अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल आपल्याला पश्चाताप होत आहे, असे रोमन कॅथोलिक पोपने नुकतेच जाहिर केले आहे.
अमेरिकी मन
शांतीसाठी व्याकूळ झालेली अमेरिकी मन चर्चकडून निराशा झाल्याने ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘एक सद्विप्रा वदन्ति’ अशी शिकवण असणा-या भारतीय ज्ञान-परंपरा आणि योगसाधनेकडे आकर्षित होत आहे. शाकाहार लोकप्रिय होत आहे. विवाह संस्था आणि एकत्र कुटुंबपध्दती मान्यता पावत आहे. हॉर्वर्डसारख्या विद्यापिठांध्ये कौमार्य रक्षणाचे स्वर उमटत आहेत. अमेरिकी समाजात हे परिवर्तन त्यांच्या अनुभवातून उत्पन्न झाले असले तरी तेथील जवळपास 20 लाख प्रवासी भारतीय समाज, हिंदू आश्रम आणि मंदिरे व जीवनशैलीचेही मोठे योगदान आहे, हे विसरूनर चालणार नाही. शिक्षण, माहिती व तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रांतील भारतीयांची प्रगती आणि योगदान यामुळेही अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा चांगली निर्माण झाली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची कुशाग्रता अमेरिकी गो-या विद्यार्थ्यांच्या तुलनेस सरस ठरत आहे, परंतु अमेरिकेन असलेली भारताची हिच प्रतिमा केवळ पूर्ण सत्य आणि अंतिम आहे असे म्हणण्यासारखी स्थिती नाही.
अमेरिकी विद्यापीठांमध्ये भारताप्रती विपुल संशोधन व सृजन होत आहे. तेथेच भारताप्रती विपुल संशोधन व सृजन होत आहे. तेथेच भारतीय धर्म, दर्शन, इतिहास आणि सामाजिक संस्थांना अतिशय विकृत स्वरूपात सादर केले जात आहे. 8 जुलैच्या ट्रिब्युनमध्ये शिकागो विद्यापीठ प्रा. मार्था नसबाम यांनी लिहिलेल्या आणि हॉवर्ड विद्यापीठ प्रेसमध्ये छापलेल्या पुस्तकाचे समीक्षण वाचावयास मिळाले. पुस्तकाच्या प्रास्ताविकात प्रा. नसबाम म्हणले. ‘भारतासंदर्भातील हे पुस्तक अमेरिका आणि युरोपातील वाचकांसाठी लिहिले आहे’, परंतु पूर्ण पुस्तक भाजपा, संघ आणि हिंदुत्वाच्या विरोधातील आहे. लेखिकेचा निष्कर्ष आहे की, भारतीय लोकशाहीला हिंदू कट्टरवाद्यांपासून धोका आहे. मला आठवते की, या पुस्तकासंदर्भात ती भारतात आली होती तेव्हा माझ्या घरीही आली होती. तिचे व्यक्तिमत्व सुसंकृत आणि शालीन आहे. 15 मिनिटांच्या वार्तालापात तिने एकदाही माझ्याशी मतभिन्नता दर्शविली नाही. येथून गेल्यानंतर जे.एन.यू. च्या काही मित्रांशी तिने माझ्या संदर्भात चांगलाच अभिप्राय दिला, परंतु नोबेल पुरस्कार विजेता प्रा. अमर्त्य सेन यांच्याशी असलेल्या घनिष्ठतेमुळे त्यांच्या विचारांवर सेन यांचा अधिक प्रभाव आहे. प्रा. अमर्त्य सेन यांची नुकतीच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘द आर्ग्युमेटिव इंडिया’ आणि ‘आयडेन्टिटी अड व्हायलेन्स’ या सेन यांच्या दोन्ही पुस्तकांमध्ये हिंदुत्वविरोध ठासून भरलेला आहे. प्रा. मार्था यांनी प्रा. अमर्त्य सेन यांच्यासोबत संयुक्तपणे पुस्तकेही लिहिली आहेत. शिकागो विद्यापीठात एका सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्रा; मार्था, अमर्त्य सेन आणि अन्य एक हिंदूविरोध विद्वान या सेमिनारमध्ये होते. यावेळी प्रा. मार्था म्हणाल्या, ‘भारतीय लोकशाहीला इस्लामी विचारधारेपासून नव्हे तर हिंदू संघटनांपासून धोका आहे.’
विकृत द्दष्टी
प्रवासी भारतीय श्री. राजीव मल्होत्रा यांनी अमेरिकी बोध्दिक केंद्रांमध्ये हिंदुविरोधी द्दष्टिकोनाचा सखोल अभ्यास केला आहे. एक-दिड वर्षात त्यांची दोन भाषणे ‘इंडिया इंन्टरनॅशनल सेंटर’ मध्ये ऐकण्याचे भाग्य आम्हास मिळाले. त्यांच्या भाषणांतून अमेरिकेची मानसिकता व महत्वकांक्षा, त्याचे ऐतिहासिक विकासक्रम, रचनात्मक आधार आणि त्यांची कार्यपद्धती यांची सुस्पष्ट माहिती मिळाली. या प्रवासातच मधु किश्वर यांनी आयोजित केलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात जाणारे भारतीय विचारवंत आशीष नंदी यांच्यासोबत राजीव मल्होत्रा यांची चर्चा ऐकावयास मिळाली. भारतीय विचारवंतामध्ये असलेल्या पाश्चिमात्यांच्या पायाशी गोंडा घोळण्याच्या वृतीची राजीव यांनी अशी चिरफाड केली, की आशीष नंदी हे एकटे पडले आहेत आणि सारे सभागृह राजीव यांच्याबरोबर आहे, असे सत्राचे अध्यक्ष पवन वर्मा यांना सांगावे लागले.
राजीव मल्होत्रा 1971 मध्ये दिल्ली येथील सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर भौतिक शास्त्र आणि संगणक विज्ञानाच्या अध्ययनासाठी अमेरिकेस आले. अमेरिकेतील अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह व मॅनेजमेंट कन्सल्टंट या पदावर कार्य केले. स्वतंत्र उपक्रमही राबविले. परंतु 10 वर्षापूर्वी त्यांनी लाभासाठी कार्य करणे सोडून दिले. 1995 मध्ये त्यांनी ‘ना नफा ना तोटा’ या तत्तापर इन्फानाईट फाऊंडेशन नामक संस्था स्थापन केली. विभिन्न सभ्यतांमध्ये सद्-भाव तयार करणे आणि भारताप्रती अमेरिकेत योग्य द्दष्टीकोन निर्माण करण्यासाठी त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून अनेक परिसंवादांचे आयोजन केले आहे, संशोधन केले आहे. त्यांचा स्वत:चा अभ्यास असामान्य आहे. इंटरनेटवरून ते सतत लेख लिहीत असतात. या राजीव मल्होत्रा यांच्या प्रेरणेतून नुकतेच एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तकाचे नाव आहे, ‘इन्वेडिग दि संक्रेड : अन अनालिसिस ऑफ हिंदुइझम स्टडीज इन अमेरिका’ (पवित्रावरील आक्रमण : अमेरिकेतील हिदुइझमवरील अभ्यासाचे विश्लेषण) हिंदुइझम शब्दाचा अनुवाद हिंदुत्व असे जाणीवपूर्वकच केलेला नाही. का माहीत नाही, परंतु राजीव मल्होत्रा स्वत:चा उल्लेख ‘नॉन हिंदुत्व हिंदू’ असे करतात परंतु त्यांचे योगदान अप्रतिम आहे. या पुस्तकातील एक पूर्ण खंड राजीव मल्होत्रा यांच्या लेखांवर आधारित आहे. या पुस्तकात अनेक अमेरिकी प्रवासी भारतीय विद्वानांचे लेख संकलित करण्यास आले आहेत. प्रत्येक लेखामध्ये विकृत अमेरिकी शोधद्दष्टीचे गंभीरपणे समीक्षण केले आहे. गणेश, काली, शिव आदी श्रद्धाकेंद्रांचे किती बीभत्स आणि विद्रूप चित्रण अमेरिकी विद्वानांनी केले आहे, हे चया पुस्तकात म्हटले आहे की, प्राध्यापक भारतावर संशोधन करण्यात गुंतले आहेत. या सा-यांचे सूत्रसंचालन ‘अमेरिकन अकेडमी ऑफ रिलिजन’ (एएआर) आणि त्याचे घटक ‘रिलिजन इन साऊथ एशिया’ (रिसा) या संस्था करतात.
भारताकडे विकृत द्दष्टीने पाहण्यामागे ख्रिस्ती पाद्री किंवा अमेरिकेची भूमिका जेवढी कारणीभूत आहे, त्याहून अधिक त्या डाव्या विचारवंतांचे(?) आहे, की जे अमेरिका आणि भारतातील विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात शिश्यवृत्तींची खिरापत वाटतात. कोणताही अमेरिकी विद्यार्थी संशोधनासाठी भारतात येतो तेव्हा विद्यापीठांमध्ये त्यांचा संबंध या डाव्या मेदूंशीच येतो. या डाव्याच्या इंग्रजी लेखनावरच तो विद्यार्थी आश्रित असतो. या गंभीर बौद्धिक आव्हानाला परास्त करण्याचे उपाय भारताला शोधावेच लागतील। अन्यथा यांचे प्रतिकूल परिणाम आपल्या परराष्ट्र, संरक्षण आणि आर्थिक नीतीवर होतच राहतील.
(लेखक हे पाँचजन्य या हिंदी साप्ताहिकाचे माजी संपादक आहेत.) (अनुवाद : सिद्धराम भै. पाटील)
सौजन्य : तरूण भारत रविवार दि.12 ऑगस्ट 2007